nav-left cat-right
cat-right

श्री महालक्ष्मी अन्नछ्त्र सेवा ट्रस्ट

हिंदुस्थानातील विविध तीर्थक्षेत्र तसेच धार्मिक ठिकाणी अन्नदान करण्याची परपंरा आहे.अन्नदान हेच पुण्यदान या श्रध्देतून शेगांव, शिर्डी, अक्कलकोट पासून ते अगदी तिरूपती बालाजीपर्यंत येणाऱ्या परगांवच्या भाविकांना अखंड अन्नदान केले जाते.तिरूपती बालाजीचे दर्शन घेतल्यानंतर महालक्ष्मीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे.त्यामुळे संपूर्ण देश-परदेशातून असंख्य भाविक सतत महालक्ष्मी दर्शनासाठी येत असतात.
साडेतीन पीठातील एक पीठ व दक्षिण काशी म्हणून प्रसिध्द असणाऱ्या करवीर नगरीतील या मंदिरात रोज अनेक संस्था, व्यक्ति तसेच देवस्थान समितीच्या वतीने प्रसाद वाटप करण्यात येते.येणाऱ्या भक्तांना संपूर्ण प्रसाद मिळावा या हेतुने महालक्ष्मी मंदिर परिसरात विविध सामाजिक उपक्रमात अग्रेसर असणारे व्यापारी ते अगदी फेरीवाले एकत्र आले.यथा शक्ति सेवा या भावनेने राजू मेवेकरी (जाधव) यांच्याबरोबर श्री महालक्ष्मी अन्नछत्र चालू केले.श्री महालक्ष्मी चरणी सेवा रूजू केल्यानंतर तिच्याच कृपाशीर्वादाने याला प्रचंड प्रतिसाद मिळाला.देशातील अगदी झारखंड, कर्नाटक, गोवा पासून महाराष्ट्रातील चंद्रपूर, गडचिरोली पासून कोकण पट्ट्यातील सुध्दा अनेक भाविकांनी दोन वर्षे या अन्नछत्राचा लाभ घेतला.
भाविकांनी लिहिलेल्या अभिप्रायामधून अनेक आशीर्वाद पाठीशी मिळाले.यातून बळ मिळून दर शुक्रवारी येणाऱ्या हजारो भाविकांना यथाशक्ती अन्नदान करण्याची सुरूवात द्वितिय वर्धापन दिनापासून करणार आहेत.या उपक्रमास करवीर मधील धार्मिक संस्था, व्यक्ति, व्यापारी अगदी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने सुध्दा पाठबळ देऊन याची व्याप्ती वाढविण्याचा प्रयत्न करावा.महालक्ष्मीच्या कृपार्शीवादाने करवीरनगरीत महालक्ष्मी मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भक्ताला महाप्रसाद मिळावा ही अपेक्षा घेऊन प्रामाणिकपणे काम करणाऱ्या श्री महालक्ष्मी अन्नछत्र ट्रस्टला लवकरात लवकर यश मिळावे, हीच महालक्ष्मी चरणी प्रार्थना.

किशोर घाटगे

Powered By Indic IME